function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } झाडे नव्हे, आयुष्यच उन्मळून पडले!

झाडे नव्हे, आयुष्यच उन्मळून पडले!

प्रवीण मुळ्ये, मुंबई जिल्ह्यातील पावस आणि आजूबाजूचा परिसर हापूस आंब्याची जन्मभूमी म्हणून ओळखला जातो. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या भागातील २५ ते ३० हजार लोकसंख्या ही व्यावसायशी निगडीत आहे. दीड लाखांहून अधिक हापूस आंब्याची लागवड असलेली येथील ८० टक्के झाडे भुईसपाट झाली आहेत. वर्षभर घाम गाळून या झाडांवर तयार झालेला हापूस अक्षरश: मातीमोल झाला आहे. मुलाप्रमाणे वाढवलेल्या आंब्याच्या झाडांच्या बागाच्या बागा डोळ्यांदेखत उन्मळून पडल्या आहेत. निसर्गाचे वादळ जरी शमले असले तरी उद्याची चिंता, डोक्यावरील बँकेचे कर्ज, कुटुंबाचा उदारनिर्वाह याचे वादळ मात्र प्रत्येक कुटुंबात घोंघावत आहे. आता पुन्हा सावरायचे कसे, हा एकच प्रश्न तौक्ते वादळात होत्याचे नव्हते झालेल्या प्रत्येकाला सतावतोय. पावसजवळील गोळप या गावातील उमंग साळवी हा तरुण शेतकरी. आंब्याच्या बागेतच लहानाचा मोठा झालेला उमंग आज आपल्या उद्ध्वस्त बागेतील प्रत्येक झाड वाचवण्याचा कसोशीने प्रयत्न करतोय. हापूस आंब्यावरच कुटुंबाची उपजीविका असलेल्या या गावातील ३५०हून अधिक आंबाउत्पादकांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. जिकडे तिकडे उन्मळून पडलेली आंब्याची झाडे, तुटलेल्या फांद्या, कवडीमोल झालेल्या आंब्याचा पडलेला सडा हे चित्र दिसतेय. आसपासच्या चांदेराई, भाट्ये, गावखेडी, मेरवी, नाखरे, कोळंबे, निरूळ अशा अनेक गावांमध्ये हीच परिस्थिती. मेहनतीने जपलेले आंब्याचे पीक तर हातचे गेले, पण उद्धवस्त झालेली आंब्याची बाग पुन्हा उभी राहायला कित्येक वर्षे जाणार आहेत. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या प्रत्येकावरच आभाळ कोसळले आहे, अशी भावना उमंग साळवीने 'मटा'कडे व्यक्त केली. पण उमंगसह इतर सहकारी हिंमत हरलेले नाहीत. सरकारने लढण्यासाठी बळ दिले तर मेहनतीच्या जोरावर निसर्गाची ही बाग पुन्हा फुलवू असा विश्वास प्रत्येक शेतकऱ्यांमध्ये आहे. राज्य सरकारने प्रत्येक बागेचा सर्व्हे करून त्यानुसार आर्थिक मदत जाहीर करावी. झाडांना लागणारी खते, औषधे, अवजारे यासाठी योग्य अनुदान द्यावे अशी आमची अपेक्षा आहे. आतापर्यंत स्वत:च्या हिंमतीवर उभ्या राहिलेल्या कोकणाला सरकारनेही साथ देण्याची गरज आहे. अन्यथा सध्याच्या बिकट परिस्थितीत अनेक आंबाउत्पादक या व्यवसायातून हद्दपार होतील, अशी चिंता भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी व्यक्त केली. २०० कोटींचे नुकसान फयान वादळापासून आंबाउत्पादकांमागील दुष्टचक्र संपलेले नाही. करोनामुळे हा व्यवसाय आधीच अडचणीत आला आहे. यंदा लहरी हवामानाचा फटका बसल्याने कसेबसे २५ टक्के पीक आले होते. पण ऐन हंगामात तौक्ते वादळाने आंबाउत्पादकांची मेहनत मातीमोल केली. कोकणातील हापूसची आर्थिक उलाढाल ही अंदाजे तीन ते चार हजार कोटींच्या घरात आहे. पावस, विजयदुर्ग, बाणकोट, कुणकेश्वर अशा भागातील तब्बल ३००हून अधिक गावांची ओळख हीच आंबाउत्पादनांतून आहे. 'तौक्ते'मुळे या सगळ्याचे झालेले नुकसान २०० कोटींच्या घरात आहे.

Post a Comment

0 Comments