मुंबई : काही दिवसांपूर्वी खताच्या किंमती वाढल्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत या किंमती कमी करण्याची मागणी केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांनीही याबाबत केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर काही खतांच्या किंमती कमी करण्यात आल्या. मात्र आता या मुद्द्यावरून भाजपने शरद पवारांवर पलटवार करत खतांच्या किंमती वाढण्यासाठी तेच जबाबदार असल्याचा दावा ( hits back to ncp ) केला आहे. 'आता खत दरवाढी विरोधात पत्र लिहिणारे शरद पवार यांचेच धोरण प्रत्यक्षात खत दरवाढीस कारणीभूत आहे. तत्कालीन कृषिमंत्री असणाऱ्या शरद पवार व यूपीए सरकार यांच्या निर्णयामुळे खत दरवाढीला सामारे जावे लागले,' असा आरोप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. 'युपीए काळात ज्यात शरद पवार कृषिमंत्री होते त्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील त्या सरकारने ‘न्यूट्रियंट बेस्ड सबसिडी पॉलिसी’ नावाचे धोरण फॉस्फॅटिक आणि पोटॅशिक खतांसाठी १ एप्रिल २०१० पासून लागू केले. त्यानुसार केंद्र सरकारने डीएपीसारख्या खतांसाठीचे अनुदान मर्यादित ठेवावे आणि कंपन्यांना खतांच्या विक्री किंमती ठरविण्याची मोकळीक द्यावे असे धोरण लागू झाले. परिणामी कंपन्यांना दरवाढीला मोकळे रान मिळाले,' असंही केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. दरम्यान, खत दरवाढ लागू होताच शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेत केंद्रीय रसायने व खते मंत्री सदानंद गौडा यांना खरमरीत पत्र लिहिलं होतं. 'सध्याच्या संकटांच्या काळात खतांच्या किंमती वाढवणे हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार असून ही दरवाढ तातडीने मागे घेण्यात यावी,' असं शरद पवार यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं.
0 Comments