function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } मृतदेह न पाहताच मृत्यूचा दाखला; डॉक्टरला चौकशीसाठी समन्स

मृतदेह न पाहताच मृत्यूचा दाखला; डॉक्टरला चौकशीसाठी समन्स

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई मुंबईसह राज्यात करोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे मृतदेह न पाहताच दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन ते चार हजार रुपये घेऊन मृत्यूचा दाखला मिळवून देणाऱ्या तिघांना मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. हे तिघे ज्या डॉक्टरकडून मृत्यूचा दाखला घेत होते त्याला नागपाडा पोलिसांनी चौकशीसाठी समन्स जारी केले आहे. या डॉक्टरच्या चौकशीतून या टोळीने किती जणांना मृत्यूचे दाखले दिले, हे स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मुंबईत करोनाचे संकट गंभीर बनले असतानाच काहीजण मृतदेह न पाहताच मृत्यूचा दाखल देत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. नागपाडा, जे. जे. मार्ग परिसरात ही टोळी कार्यरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या मदतीने सनी कवळे या तरुणाशी संपर्क साधला. सनी याला एक बोगस मृत्यूचा दाखला तयार करण्यासाठी किती खर्च येईल, याबाबत विचारणा केली असता त्याने तीन हजार रुपये लागतील, असे सांगितले. पोलिसांच्या बोगस ग्राहकाने यासाठी होकार देत सनी याला आधारकार्ड व्हॉट्सअॅपवरून पाठवले. सनी याने पैसे घेऊन नागपाडा येथे बोलविल्यानंतर बोगस ग्राहकासह पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला. नागपाडा परिसरात साध्या वेशात दबा धरून बसलेल्या पोलिसांनी सनी कवळे याच्यासह त्याचा साथीदार सोमनाथ गायकवाड, दशरथ गुरव या तिघांना ताब्यात घेतले. या तिघांकडून पोलिसांनी काही मृत्यूचे दाखले आणि इतर कागदपत्र हस्तगत केले. चौकशीमध्ये या तिघांनी हे दाखले डॉक्टर सागर इनामदार यांच्याकडून तयार करून घेतल्याचे सांगितले. गुन्हे शाखेच्या पथकाने या आरोपींना नागपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. नागपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून या तिघांना अटक केली असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. सागर इनामदार यांना चौकशीसाठी समन्स पाठविल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेश पाटील यांच्यासह नार्वेकर, संदीप कांबळे, साळुंखे यांच्या पथकाने या टोळीचा माग काढला.

Post a Comment

0 Comments