function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } मुंबईच्या मालाडमध्ये तौक्ते चक्रीवादळाने हिरावला कुटुंबाचा आधार

मुंबईच्या मालाडमध्ये तौक्ते चक्रीवादळाने हिरावला कुटुंबाचा आधार

म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : मुंबईत सोमवारी धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळाने आणखी एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतला आहे. वरळी येथे झाड पडून महिलेच्या मृत्यूनंतर मालाडमधील दुर्घटनेत जखमी झालेल्या तरुणाचेही निधन झाले आहे. राजकुमार जयस्वाल असे या तरुणाचे नाव असून त्याच्या पश्चात अंध आई-वडील, पत्नी आणि मुले असा परिवार आहे. वादळकाळात विक्रोळीत एक महिला झाड कोसळत असताना थोडक्यात बचावली, तर वरळीमध्ये झाड पडून एकीचा मृत्यू झाला. असा प्रकार मालाडमध्येही घडला. या परिसरात किराणा मालाचा व्यवसाय करणारे राजकुमार जयस्वाल सोमवारी दुचाकीवरून घराबाहेर पडले. एका दुकानातून बाहेर पडले आणि दुचाकीवरून जात असतानाच त्यांच्यावर झाडाची भली मोठी फांदी पडली. डोक्यावर आघात झाल्यामुळे राजकुमार दुचाकीसह खाली कोसळले. फांदीचा फटका इतका जोरदार होता की, त्याच्या डोक्यावरील हेल्मेटचे दोन तुकडे झाले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे राजकुमार हे जागीच बेशुद्ध पडले. स्थानिकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सायन रुग्णालयात हलविण्यात आले. सायन रुग्णालयात त्यांच्यावर सुमारे १३ तास शस्त्रक्रिया पार पडली; मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. राजकुमार जयस्वाल यांचे आई-वडील अंध असून पत्नी आणि मुले उत्तर प्रदेशात वास्तव्यास असतात. राजकुमार यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असल्याने त्यांच्या जाण्याने कुटुंबाने आधारच गमावला आहे. शासनाने तसेच पालिकेच्या वतीने त्यांना आर्थिक मदत व्हावी, अशी आशा स्थानिक व्यक्त करीत आहेत.

Post a Comment

0 Comments