म. टा. प्रतिनिधी, मुंबईः तौक्ते चक्रीवादळामुळे खवळलेल्या समुद्रात ओएनजीसीचे तब्बल ९३ कर्मचारी बेपत्ता झाल्याची भीती निर्माण झाली आहे. 'मुंबई हाय' येथील बार्ज (तेल उत्खनन करणारा निवासी तरंगता फलाट) समुद्रात बुडाल्यामुळे ही दुर्घटना घडली. नौदल, तटरक्षक दलासह अन्य सागरी कंपन्यांच्या नौका सोमवारी संध्याकाळपासून तेथील २७३ कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी धाडसी प्रयत्न करीत असून त्यापैकी १८० जणांची सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे. उर्वरित ९३ जण अद्याप बेपत्ता असल्याने चिंता वाढल्या आहेत. खोल समुद्रातील 'मुंबई हाय' येथील हीरा तेल विहीर परिसरात ओएनजीसीचा 'पापा-३०५' हा बार्ज आहे. तेथे अॅफकॉन्स कंपनीकडून तीन विहिरींवर काम सुरू आहे. यासाठी तब्बल २७३ कर्मचारी तेथे कार्यरत होते. परंतु 'तौक्ते' चक्रीवादळादरम्यान या भागात सोमवारी समुद्राला उधाण आले. परिणामी बार्जला धक्के लागणे सुरू झाले. त्यामुळे बार्ज प्रमुखांनी बचावाचा संदेश पाठवला. त्यानुसार नौदलाने सोमवारी दुपारनंतर बचाव सुरू केला. नौदलाने सुरुवातीला 'आयएनएस कोलकाता' व 'आयएनएस कोची' या विनाशिका श्रेणीतील युद्धनौका धाडल्या. या दोन्ही विनाशिकांनी धो-धो पाऊस, सोसाट्याचा वारा अशा परिस्थितीत खवळलेल्या समुद्रात रात्रभर बचावाचा प्रयत्न केला. पण कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचणे अत्यंत अवघड होते. त्याचदरम्यान, हा बार्ज लाटांच्या माऱ्यामुळे समुद्रात बुडाला. तो बुडत असतानाच तेथील अनेक कर्मचाऱ्यांनी समुद्रात उड्या घेतल्या. शेकडो कर्मचारी खवळलेल्या समुद्रात रात्रभर गटांगळ्या खात, पोहत होते. नौदलाच्या युद्धनौका त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत होत्या. पण त्यातील मोजक्या कर्मचाऱ्यांना वाचवता आले. त्यामुळे नौदलाने सकाळी मोहिमेची व्याप्ती वाढवली. सकाळी वातावरण थोडे सुधारल्याने कुलाब्यातील 'आयएनएस शिक्रा' हवाईतळावरून सी किंग हेलिकॉप्टर बचावासाठी धाडण्यात आले. हे हेलिकॉप्टरने जखमी असलेल्या चार कर्मचाऱ्यांना घेऊन कुलाब्यात आले. याखेरीज 'आयएनएस ब्यास', 'आयएनएस बेतवा' व 'आयएनएस तेग' या अन्य युद्धनौकादेखील बचाव कार्यासाठी धाडण्यात आल्या. या चार युद्धनौकांसह व नौकायान कंपनीच्या नौकादेखील मंगळवारी रात्रीपर्यंत बचावकार्य करीत होत्या. तटरक्षक दलानेदेखील 'समुद्र प्रहरी' व 'समर्थ' या नौका धाडल्या. रात्री उशिरापर्यंत १८० कर्मचाऱ्यांना वाचविण्यात नौदलाला यश आले. अॅफकॉन्सने दिलेल्या माहितीनुसार १८२ जणांची सुटका करण्यात आली आहे. बचावलेल्या कर्मचाऱ्यांना घेऊन युद्धनौका बुधवारी सकाळी ११ वाजता कुलाब्यात पोहचणार आहेत. मंगळवारी रात्री उशिरा अखेरचे वृत्त हाती येईपर्यंत ९३ कर्मचाऱ्यांचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे चिंता वाढल्या आहेत. मुंबईच्या दक्षिणेला ६० किमीवर थरार ही जागा मुंबईच्या किनाऱ्यापासून दक्षिणेला ३८ सागरी मैल अर्थात सुमारे ७० किमी अंतरावर आहे. ही जागा आंतरराष्ट्रीय समुद्र या नात्याने 'एक्स्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन'मध्ये (ईईझेड) आहे. तेथे मागील ३० वर्षांपासून तेल उत्खनन सुरू आहे. पण अशाप्रकारे अवजड धातूचा बार्ज समुद्रात बुडाल्याची घटना आजवर घडली नसल्याचे जाणकार सांगतात. या चक्रीवादळादरम्यान ताशी १५० किमी वेगाने सहा ते आठ मीटर उंच लाटा येत होत्या. या लाटा सोमवारी पहाटेपासून ते मंगळवारी सकाळपर्यंत सुमारे ३२ तास अखंड धडकत होत्या, असे ओएनजीसीने म्हटले आहे. आम्ही तात्काळ उड्या टाकल्या... सोमवारी रात्री बार्ज बुडू लागला. प्रत्येकाने समुद्रात उड्या घेतल्या. ज्याला पोहता येत होते, त्याने कसेबसे स्वत:ला सावरले. किती जण बार्जसह समुद्रात गेले याची माहिती नाही. उड्या मारल्यावर प्रत्येकजण वेगवेगळ्या दिशेला फेकला गेला. आम्ही अख्खी रात्र पावसात व समुद्राच्या पाण्यात काढली. - संदीप सिंह, बार्जवर कार्यरत मेकॅनिकल इंजिनीअर (हेलिकॉप्टरने मुंबईत आणले गेले)
0 Comments