function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } 'त्या' दाम्पत्याला अखेर सहा महिन्यांनंतर जामीन दिलासा

'त्या' दाम्पत्याला अखेर सहा महिन्यांनंतर जामीन दिलासा

म. टा. विशेष प्रतिनिधी, अपत्यप्राप्ती होत नसल्याने बाळ दत्तक घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या दाम्पत्याने एका महिलेवर विश्वास ठेवत तिला दत्तक प्रक्रियेसाठी १५ हजार रुपये देऊन एक वर्षाचे बाळ घेतले. मात्र, या बाळाच्या अपहरण व चोरीच्या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली. अखेर सहा महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून नुकताच जामीन दिलासा मिळाला आहे. 'बाळाची तस्करी करण्याचा अर्जदारांचा हेतू होता, असे दिसत नाही. त्यांना मूल दत्तक घ्यायचे होते. आरोपी क्रमांक एकने त्यांना बाळ दत्तक देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात आरोपी क्रमांक एकने फूटपाथवर झोपलेल्या दाम्पत्याच्या बाळाचे अपहरण केले आणि अर्जदार दाम्पत्याला दिले. तसेच बाळाची दत्तक प्रक्रिया नंतर पूर्ण करून देऊ, असे आश्वासन त्या दाम्पत्याला दिल्याचे दिसते', असे निरीक्षण न्या. सुरेंद्र तावडे यांनी जामीन मंजूर करताना आदेशात नोंदवले. अर्जदारांनी या प्रकरणातील साक्षीदारांवर दबाव आणू नये आणि पुराव्यांविषयी छेडछाड करू नये, अशी अटही न्यायमूर्तींनी घातली. 'एका हाऊसिंग सोसायटीच्या बाहेरच्या फुटपाथवर मी माझे पती व एक वर्षाच्या बाळासोबत झोपले होते. मात्र, सकाळी उठून पाहिल्यावर बाळ बेपत्ता होते', अशी तक्रार एका महिलेने चारकोप पोलिसांत दिली होती. त्याविषयी तपास केला असता गाऊन घातलेल्या एका महिलेने बाळ चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी ३ नोव्हेंबर २०२० रोजी एफआयआर नोंदवला आणि त्या महिलेचा शोध घेऊन तिला तिच्या पतीसह त्यांच्या निवासस्थानाहून अटक केली. रश्मी नावाच्या या महिलेने ते बाळ १५ हजार रुपयांना एका दाम्पत्याला विकल्याची माहिती चौकशीत दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याच दिवशी या अर्जदार दाम्पत्यालाही अटक केली. न्यायदंडाधिकारी न्यायालयाने व दिंडोशी सत्र न्यायालयानेही जामीन अर्ज फेटाळल्याने या दाम्पत्याने अॅड. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अर्ज केला होता. 'अर्जदार दाम्पत्य हे आरोपी नसून खरे तर स्वत:च पीडित आहे. ते बाळ दत्तक घेण्यासाठी प्रयत्नशील होते. रश्मी नामक आरोपी महिलेने त्यांना दत्तक प्रक्रियेद्वारे बाळ मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार एकेदिवशी हे एक वर्षाचे बाळ रश्मीने दाम्पत्याला दिले आणि दत्तक प्रक्रिया नंतर पूर्ण करून देऊ, असे सांगून त्यांच्याकडून त्याविषयीचे पैसे घेतले. बाळासाठी बाजारातून कपडे व अन्य वस्तू खरेदी करण्यासाठी गेले असतानाच पोलिसांनी या दाम्पत्याला अटक केली. त्यांनी कधीही फरार होण्याचा प्रयत्न केला नाही. उलट पोलिसांना तपासात सहकार्यच केले. शिवाय पोलिसांनी याप्रकरणी तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले आहे. त्यामुळे हे दाम्पत्य जामिनासाठी पात्र आहे', असा युक्तिवाद वारूंजीकर यांनी मांडला. तो न्यायालयाने ग्राह्य धरला.

Post a Comment

0 Comments