function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } कॅन्सरग्रस्त मुलांना करोनाकाळात आधार

कॅन्सरग्रस्त मुलांना करोनाकाळात आधार

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईच्या टाटा कॅन्सर रुग्णालयामध्ये केवळ शहराच्याच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक रुग्ण येत असतात. यात कॅन्सरग्रस्त असलेल्या प्रौढ रुग्णांचा जसा समावेश आहे तशीच त्यात अनेक लहान मुलेही असतात. करोना संसर्ग सुरू झाल्यानंतर लॉकडाउन तसेच, इतर वेगवेगळ्या निर्बंधामुळे या रुग्णांचा रुग्णालयांकडे येण्याचा ओघ कमी झाला. रुग्णालयाचे कर्मचारी मात्र कॅन्सरग्रस्त रुग्णाला योग्य वेळेमध्ये वैद्यकीय मदत मिळायला हवी, यासाठी धडपडत होते. या रुग्णालयातील सुप्रिया कांबळे या बालरुग्णांच्या विभागामध्ये काम करतात, त्यांच्या बोलण्यातही हीच तळमळ जाणवते. कॅन्सरग्रस्त मुलांचे काय होणार हा प्रश्न निर्माण झाला होता. उपचारासाठी उशीर केला तर हे रुग्ण पॅलेटीव्ह केअरच्या म्हणजे पुढच्या टप्प्यात जातात, त्यामुळे त्यांना योग्यवेळी वैद्यकीय उपचार मिळणे गरजेचे होते. करोनाकाळात केलेल्या कामाचा अनुभव नेमक्या शब्दांत व्यक्त करताना प्रत्येक दिवस युद्धासमान असतो असा उल्लेख त्या करतात. मात्र सैनिकाला युद्धामध्ये लढायचे असते, आपल्या देशाला जिंकून द्यायचे हेच ध्येय असते, तसेच ध्येय या रुग्णालयाच्या प्रत्येकांचे असल्याने ही लढाई जिंकणार, हा विश्वास मनात कायम होता, हे त्या आवर्जून सांगतात. प्रौढ रुग्णांमध्ये कॅन्सरची लागण झाल्यानंतर त्यातले अनेकजण धीराने घेतात, काही कोसळतात, जे घाबरतात त्यांना कुटुंबातील समजूतदार सदस्य धीर देतात. लहान मुलांच्या बाबतीत संवदेनशील पालक, कुटुंबातील इतर सदस्य अधिक हळवे होतात. कॅन्सरसारखा दुर्धर आजार आणि त्यात करोना संसर्गाचा फैलाव. अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या पालकांना धीर देत त्यांना रुग्णालयामध्ये आल्यानंतर दिलासा देणे, मार्गदर्शन करण्यासह वैद्यकीय उपचार सुरु असताना मुल बरे होणार हा विश्वास देत राहणे गरजेचे होते. ज्या दिवशी पहिला रुग्ण आढळला तेव्हा विलगीकरणाची प्रक्रियाही सुरू झाली. जे खूप दूर राहणारे होते त्यांना रुग्णालयापर्यंत येता आले नाही. त्या काम करत असलेला वॉर्ड सहा ते सात जणांच्या वैद्यकीय निगराणीखाली असतो, करोनाच्या काळात तिघींनी या वैद्यकीय सेवेचे आव्हान सक्षमपणे पार पाडले. करोनाने शेकडो 'निगेटिव्ह' गोष्टी घडल्या, परंतु याच काळाने माणुसकी, कणव, संवेदनशीलता, नेतृत्वगुणाचीही जाण करून दिल्याचे सुप्रिया सांगतात. लॉकडाउनच्या काळामध्ये अनेक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची वाहनांची सुविधा उपलब्ध नव्हती. लोकलसेवा बंद झाल्यानंतर टाटा रुग्णालय प्रशासनाचा प्लॅन बी तयार होता. पहिला रुग्ण आढळल्यानंतरही कॅन्सर असलेल्या मुलांची काळजी वाटू लागली. पण धीराने या आजाराचा मुकाबला करण्यासाठी मानसिक तयारीही केली होती. वॉर्डमध्ये सेवा देताना चाचणी केलेल्या मुलांना अंतिम अहवाल येईपर्यंत वॉर्डमध्ये ठेवले जायचे, तिथेही त्यांची कॅन्सर प्रतिबंध करण्यासाठी देण्यात येणारे वैद्यकीय उपचार सुरळीत ठेवण्यात आले होते. सहआजार असलेल्या अनेक रुग्णांना करोनाचा संसर्ग झाल्यानंतर विविध प्रकारची गुंतागुंत निर्माण झाली होती. कॅन्सर असलेल्या रुग्णांची लढाईही अधिक बिकट होती, परंतु रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी केलेले नियोजन आणि उत्तम व्यवस्थापनामुळे हे शिवधनुष्य पेलता आले, असे त्या सांगतात. वैद्यकीय सेवा देत असताना सुप्रियांच्या संपर्कात असलेल्या एका सहकारी पॉझिटिव्ह ठरल्या. त्यामुळे सुप्रियांना विलगीकरणात राहावे लागले. त्यांचे कुटुंबीय त्यावेळी गावी होते. ते करोना संसर्गाच्या सुरुवातीचे दिवस होते, सगळीकडे खिन्न उदास वातावरण होते, एकीकडे स्वतःच्या मुलांची काळजी अन् दुसरीकडे रुग्णालयातील मुलांची ओढ... अशा प्रतिकूल स्थितीतही कॅन्सरग्रस्त मुलांना रुगणसेवा देण्याचे मोठे समाधान लाभले, हे सांगताना त्यांच्या आवाजात सार्थकता असते.

Post a Comment

0 Comments