मुंबईः अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका मुंबईलाही जाणवला. सोमवारी आणि मंगळवारी सोसट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसानं मुंबईकरांची दाणादाण उडवली. तौक्ते चक्रीवादळाचा फटका मुंबईतील सात किनाऱ्यांनाही बसला आहे. या किनाऱ्यांवरुन मंगळवारी तब्बल ६२ हजार १० किलो कचरा किनाऱ्यावर वाहून आला आहे. मुंबई महापालिकेकडून समुद्रात कचरा न टाकण्याचं आवाहन वारंवार केलं जातं. मात्र, तरीही काही उत्साही पर्यटक समुद्रात कचरा टाकतात. समुद्राच्या पोटात साठलेला हा कचरा मुंबईकरांना साभार परत केला आहे. तौक्ते चक्रीवादळामुळं उसळणाऱ्या महाकाय लाटांनी हा कचरा पुन्हा किनाऱ्यालगत आणला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल ६२ हजार १० किलो कचरा गोळा केला आहे. यात ८७ टक्के कचरा तर वादळाच्या दुसऱ्या दिवशी किनाऱ्यावर वाहून आला होता. त्या तुलनेने वादळाच्या दिवशी म्हणजेच १५ मे रोजी ३३ हजार ११० किलो कचरा साफ करण्यात आला होता. दादरसारख्या किनाऱ्यावरुन सर्वात जास्त कचरा साफ करण्यात आला आहे. तर, जुहू सारख्या अधिक वर्दळ असलेल्या किनाऱ्यावर नेहमीपेक्षा कमी कचरा गोळा करण्यात आला आहे. समुद्रकिनाऱ्यांपेक्षा वाऱ्याची दिशा आणि लाटांची दिशा यामुळं समुद्रकिनाऱ्यांवर कमी अधिक प्रमाणात कचरा आढळून आला आहे, असं झोरु या सामजिक कार्यकर्त्यांनं म्हटलं आहे. शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारांमध्ये कचराही वाहून समुद्रात जातो. त्यामुळं अशा वादळाच्या वेळी समुद्र कचरा बाहेर फेकतो. म्हणून शहरातील रस्त्यांवरील कचरा गटारांमधून समुद्रात जाणार नाही यासाठी योग्य यंत्रणा असली पाहिजे, असं झोरु यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मुंबईच्या नद्या-नाल्यांमधील गाळ आणि कचरा उचलला न गेल्याने तौक्ते चक्रीवादळामुळे आलेल्या पावसानंतर मुंबईतील नद्या कचरावाहिन्या बनून वाहताना दिसल्या. या नद्यांमधील पाणी काळ्या रंगाचे होते असे निरीक्षण स्थानिकांनी नोंदवले. नालेसफाई आणि नदीची स्वच्छता न झाल्याने हे अस्वच्छ आणि कचरायुक्त पाणी समुद्रात जाणार आणि त्यामुळे सागरी जीवांना धोका निर्माण होण्याची भीती असते.
0 Comments